Dharmaveer 2 : मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट शिवसेनेचे दिवंगत नेते व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित होता. तेंव्हा ही या चित्रपटामुळे राजकीय वादळ उठले होते आणि आता 28 सप्टेंबर 2024 रोजी याच चित्रपटाचा दुसरा भाग Dharmaveer 2 रिलीज झाला आहे या चित्रपटामुळे देखील राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण होत असल्याचे आपल्याला दिसत आहे. पण दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतात दिसत आहे.
कोणी साकारल्या आहेत भूमिका?
‛धर्मवीर २- गोष्ट साहेबांच्या हिंदुत्ववाची’ या आधीच्या चित्रपटात प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती या चित्रपटात देखील त्यांनीच आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दाते यांनी साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे असून चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांची आहे.
Dharmaveer 2 ची किती झाली कमाई?
चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्ट्रावर पोस्ट करून Dharmaveer 2’ चित्रपटाच्या ओपनिंग बद्दल माहिती दिली. ‛Dharmaveer 2’ या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची आकडेवारी देण्यात आली आहे. चित्रपटाने दमदार ओपनिंग केली असून पहिल्या दिवशी ‛ धर्मवीर २’ चित्रपटाने 1.92 कोटी रूपये कमावले. 2024 मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळते.
“पहिल्याच दिवशी नेट 1.92 कोटी कमवून ‛Dharmaveer 2’ सिनेमा ठरला या वर्षीचा सगळ्यांत जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट!! संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन!! धर्मवीर-२” असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.
Dharmaveer 2 कधी होणार होता रिलीज?
‛ Dharmaveer 2’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास तो 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता पण त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. पूरस्थितीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आणि तो चित्रपट 28 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित झाला.
चित्रपटाचे राजकीय क्षेत्रात उमटले पडसाद
संजय राऊत यांनी धर्मवीर चित्रपटावर सडकून टीका केली आहे. ते टीका करताना म्हणाले की ‛दिघे साहेबांचं पार्थिव एकनाथ शिंदे घेऊन जाताना दाखवले आहे. हा दिघे साहेबांचा अपमान आहे. खरं तर ठाण्याच्या पचखडीत ऑस्करचं ऑफिस टाकलं पाहिजे आणि यांना ऑस्कर देऊन गौरवले पाहिजे.’ असा टोला लगावतानाच सिनेमाच्या सुरवातीलाच हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित नाही, अशी सूचना ही टाकली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. तसेच चित्रपटातील बऱ्याच सीन्सवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. पुढे संजय राऊत म्हणाले की ‛ जसजशा निवडणुका येतील तसं तसे 1,2,3,4,5 येतील. धर्मवीरांना आम्ही चांगलं ओळखतो. दिघे साहेबांचं निधन 2001 साली झाले. राज ठाकरे यांनी 2005 साली पक्ष सोडला. ज्यांनी 2005 साली पक्ष सोडला. त्यांच्याबाबत 2001 रोजी स्वर्गवासी झालेले दिघे साहेब बोलत आहेत. अत्यंत बकवास आणि बोगस सिनेमा आहे हा. हा काल्पनिक सिनेमा आहे. काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवून एक प्रकारे दिघे साहेबांचे चारित्र्य हनन केलं आहे.

दिघे साहेबांच्या अनेक गोष्टींला मी साक्षीदार आहे, दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर दिघेसाहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री दवाखान्यातून उतरताना दाखवले आहेत. तुम्ही पाहा सिनेमातील दृश्य. दिघे साहेबांचे पार्थिव खांद्यावर टाकून.. दुसरे कोणी नव्हता तिथे. कोणता सिनेमा आहे हा?
कोण लिहिलंय असं? हा दिघे साहेबांचा अपमान आहे. त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचा ही अपमान आहे. पैशाच्या लालसेने कलाकार, लेखक, सिनेमा करत आहेत. आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या वेळी आम्ही तिथे होतो. आम्हाला सर्व माहीत आहे. चित्रपटाचा सत्य आणि वास्तवतेशी काही संबंध नाही. अशी ओळ सिनेमाच्या सुरवातीला टाकली पाहिजे. हा दिघे साहेबांचा अपमान आहे अशी टीका संजय राऊत यांनी या चित्रपटावर केली आहे.
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की “ मी काल दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल भाष्य केले आहे. त्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया आल्या. मात्र मला जी शंका वाटली मी बोललो. दिघे साहेब यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे अतोनात प्रेम होते. दिघे साहेबांनी कधीही बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला बसण्याची देखील हिंमत केली नाही. मात्र दिघे किंग होत आहेत याची खुन्नस काही जणांना वाटत होती. त्यामुळे हे सर्व झाले. आनंद दिघेंना मोठ्या पदावर बसवले तर आपल्याला अडचण होऊ शकते, अशा लोकांनी त्यांचा काटा काढला. मी अशी अनेक प्रकरणे उघड करण्याची ताकद ठेवतो. त्यावेळी केले तसे राजकारण आज ही ती करत आहेत. त्या लोकांमुळे राणे,भुजबळ,राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. पक्ष सोडलेली लोकं शिवसेनाप्रमुखांच्या विरोधात नव्हती तर काही लोकांमुळे त्यांनी पक्ष सोडला.” असे विधान शिरसाट यांनी केले आहे.
‛ Dharmaveer 2’ हा चित्रपट ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित झाला आहे आणि हा चित्रपट आनंद दिघे सारख्या राजकीय व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित असल्याने राजकीय वर्तुळात देखील धुरळा उठत आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर चित्रपट मात्र चांगला गल्ला जमवताना आपल्याला दिसत आहे.