रुमेवाडी नाका येथील काजू कारखान्याला आग
बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर शहराला लागून असलेल्या रुमेवाडी नाका येथील काजू कारखान्याला सोमवारी रात्री अडीच वाजता शॉर्टसर्किटने आग लागून ₹ लाखो रुपयांचे काजूगर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यात काजू कारखान्याचे मालक सुरेश शिवनगेकर यांनी कोटीचे नुकसान झाले असल्याचे सांगितले.
रुमेवाडी नाका येथे सुरेश शिवनगेकर यांचा काजू कारखाना आहे. या कारखान्यात कच्च्या काजूवर प्रक्रिया करून काजूगर तयार करण्यात येतो. शिवनगेकर हे मोठ्या प्रमाणात कच्च्या काजू खरेदी करून कारखान्यात ठेवतात. जवळपास 30 टन काजूगर तयार करून ठेवण्यात आले होते. यासाठी गोडाऊनमध्ये रुम टेंपरेचर योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी हिटरचा वापर करण्यात येत होता. सोमवारी रात्री या काजूवर प्रक्रिया करतेवेळी शॉर्टसर्किटने आग लागली. सुरेश शिवनगेकर आणि त्यांचे भाऊ नेताजी शिवनगेकर याच ठिकाणी राहतात. त्यामुळे रात्री आग लागल्याचे समजताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच शेजाऱ्यांना उठवून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
अग्निशमन दल वेळेवर हजर झाल्यानंतर आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र या आगीत 30 टन काजूगर जळून खाक झाले. त्याचबरोबर इमारतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, एक काजू प्रक्रिया करण्याचे यंत्रही जळून खाक झाले आहे. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.
मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक सुदर्शन पटणकुडी, उपनिरीक्षक एम. बी. बिराजदार, हेकॉमचे अधिकारी नांगणूर, तहसीलदार प्रकाश गायकवाड तसेच तलाठी, अग्निशामक दलाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. अग्निशमन दलाचे मनोहर राठोड यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Khanapur Belgaum Cashew factory fire
Khanapur Belgaum Cashew factory fire