बारामती विधानसभा निवडणूक नेहमीच लक्षवेधी ठरते, पण यंदाची निवडणूक अधिकच महत्त्वाची आहे. AJIT PAWAR यांनी बारामतीकरांसोबतच माळेगावकरांशी संवाद साधत भावनिक आवाहन केलं आहे. त्यांच्या प्रचारसभांमध्ये बारामतीच्या विकासासाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला जातोय, तर माळेगाव भागातील राजकारणावर थेट भाष्य करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
काम केलं, पण त्याची किंमत राहिली नाही
AJIT PAWAR आपल्या भाषणात म्हणाले, “1990 पासून निवडणुकीला सामोरा जातोय. बारामतीच्या विकासासाठी मी काय काय केलं, ते सांगायची गरज नाही, पण आता असं वाटतंय की आपण फार काम केलं, पण त्याची किंमत बारामतीकरांना राहिली नाही.”
या विधानानंतर त्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. “परवा साहेब म्हणाले, ‘मी 30 वर्षं काम केलं, आता पुढच्याला संधी द्या.’ पण मला एक सांगा, पवारांशिवाय दुसरा कोणी आहे का? बाकीच्यांनी काय करायचं? गोट्या खेळायच्या का? कोणतीही जबाबदारी मिळते, तेव्हा ती पेलण्याची ताकद असावी लागते,” असा टोला त्यांनी लगावला.
मला मतदान करा, बारामतीचा विकास थांबू नका
बारामतीच्या लोकांना आवाहन करताना AJIT PAWAR म्हणाले, “साहेबांच्या विचाराने सुप्रिया ताईंना लोकसभेला तुम्ही मतदान केलं. आता विधानसभेला मला मतदान करा. लाडकी बहीण योजना, वीज बिल माफी, दुधासाठी वाढीव अनुदान या योजना चालू ठेवायच्या असतील, तर घड्याळाला मतदान करा.”
बारामतीच्या विकासात ते आपलं योगदान किती महत्त्वाचं आहे, हे सांगताना ते म्हणाले, “मी पाणी विचारल्याशिवाय येतंय, कामं होतायत. पण एकदा कॅनलचं पाणी बंद झालं, तर अजित पवारची आठवण येईल.”
माळेगावमध्ये काय चाललंय
माळेगाव भागात तावरे आणि काटे गटांमधील वादांवर बोलताना ते म्हणाले, “माझ्याकडे आलं नाहीत, तरी चालेल. पण विकासासाठी विचार करा. माळेगाव भागात कधी ऊसाशिवाय काही पिकत नव्हतं, पण आज इथं चित्र बदललं आहे. काही सहकारी म्हणाले, ‘तुमचं आम्ही मान राखू, पण…’ असं बोलायचं आणि मग पाठीत खंजीर खुपसायचा.”
अजित पवारांनी माळेगावकरांना विचारलं, “एक जरी माणूस असं म्हणत असेल की, ‘अजित पवार, तुमचं मदतीचं वचन पाळलं नाही,’ तर सांगा. मी कधीच सभांना पैसे देऊन गर्दी जमवली नाही. चुकीच्या सवयी लावणं सोपं आहे, पण चांगल्या सवयी लावून विचार करत पुढे जाणं यातच खरं भलं आहे.”
9000 कोटी रुपये आणणं सहज नाही
बारामतीच्या विकासात त्यांनी घेतलेली मेहनत सांगताना अजित पवार म्हणाले, “मी तुमच्यासाठी 9000 कोटी रुपये आणले. शंभर कोटींचे प्रोजेक्ट राबवले. हे सहज शक्य होतं का? आमची प्रशासनावर पकड आहे, म्हणूनच सगळी कामं झाली. आजूबाजूच्या तालुक्यांशी तुलना करा, तिथं असं चित्र दिसतंय का?”
बारामतीचा विकास पुढे न्यायचा असेल, तर त्यासाठी नेतृत्वावर विश्वास ठेवण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
भावनिक साद आणि टोमणे- AJIT PAWAR
अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या विधानावरून टोमणेही मारले. “साहेबांनी निवृत्तीबाबत बोललं, पण यानंतर बारामतीचं नेतृत्व कोण करेल? फलटण तालुका एकेकाळी आपल्यापुढे होता, पण आज आपण त्यांच्यापुढे आहोत. हे साध्य कसं झालं?”
माळेगावमधील संस्थांच्या व्यवस्थापनावरही ते बोलले, “संस्था चांगल्या चालवायच्या असतील, तर दबदबा हवा. तुमच्या भागासाठी रस्ते मंजूर केले, पण त्याची किंमत तुम्हाला राहिली नाही. हा विचार करा.”
भावनिक नातं जपणं महत्त्वाचं
“लाडक्या बहीण योजनेपासून शून्य वीज बिलांपर्यंत सगळं तुमच्यासाठी आहे. बारामतीकरांनी याचा विचार केला पाहिजे. मला मतदान करा, तरच हा विकास पुढे सुरू राहील. मी नेहमीच तुमचं भलं पाहिलं आहे,” असं सांगत अजित पवारांनी आपलं भावनिक आवाहन पूर्ण केलं.
बारामती विधानसभा निवडणुकीत AJIT PAWAR यांचा भावनिक सूर कितपत परिणामकारक ठरेल, हे येणाऱ्या निकालातूनच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की—ही लढत हायव्होल्टेज ठरणार आहे.